गुरु-शिष्य ही परंपरा फार प्राचीन आहे. संतांनी गुरुमहिमा वर्णन केलेला आहे. तसेच उत्तम शिष्याची लक्षणे ही सांगितली आहेत. फक्त गुरु ज्ञानी असून चालत नाही. तर शिष्यदेखील ज्ञानलालसा असलेला हवा. शिक्षणामुळे मनुष्य जीवन सुखी व समृद्ध बनते. शिष्याला आदर्श, सर्वांगीण विकसित बनविण्याची किमया गुरूच करीत असतो. अनेक गुरु शिष्वांच्या आदर्श जोड्या प्रसिद्ध आहेत.
गुरुकृपा ज्याला लाभते त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नसते. पण त्यासाठी शिष्यानेदेखील गुरुच्या कसोटीला उतरले पाहिजे, ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्ती नाथांना आपले गुरु बनवले होते. त्यांच्याबद्दल त्याच्या मनात नितान्त आदर होता.
तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरु श्री निवृत्तीनाथु ।
आपण जे काही आहोत ते आपल्या गुरुमुळेच, अशी ज्ञानदेवांची भावना होती. अन् माझ्या मते अशी भावना शिष्याची असायला हवी. एकलव्याच्या जीवनातही गुरुला अनन्यसाधारण महत्त्व होते. गुरुने विद्या देण्यास नकार दिल्यावर त्याने मातीच्या पुतळ्याची उभारणी करुन निष्ठेने धनुर्विद्या मिळविली व स्वतः बरोबर तिन्ही लोकांत गुरुचेही नाव मोठे केले.
मला वाटते, आदर्शप्रद पोहोचायचे असेल तर गुरुवर पूर्ण निष्ठा हवी अन् गुरुदेखील त्या निष्ठेला पात्र हवा. गुरुबद्दल आदर वाटावा असे गुरुचेंही वर्तन हवे. प्राचीन काळी आदर्श ठेवण्यासारखे गुरु होते. गुरु ज्ञानाने परिपूर्ण हवा. पण आपले ज्ञान शिष्यापर्यंत पोहोचवण्याची कलाही त्याला अवगत हवी. प्रेम आदर या गोष्टी दोघांच्याही ठायी हव्यात. शिष्याला येणाऱ्या अडचणी गुरुने सोडविल्या पाहिजेत. उत्तम शिक्षक हा निरंतर शिष्य असतो या भावनेने गुरूने नवीन ज्ञान ग्रहण केले पाहिजे व शिष्यापर्यंत पोहोचवले पाहिजे व शिष्यानेदेखील ते आस्थेने ग्रहण केले पाहिजे.
शिष्याला अभ्यासाची गोडी वाटावी, चांगले संस्कार घडवून घेण्याची इच्छा व्हावी. त्यासाठी गुरूदेखील आदर्श, उत्तम अभ्यासक व सुसंस्कारीत हवा. गुरूने देखील सतत अभ्यासू असायला हवे. त्याच्या घरी स्वत:चे ग्रंथालय असावे.
गुरू-शिष्य दोघांचीही वृत्ती खिलाडू असायला हवी. वृत्तीत क्षमाशीलता, कोमलता हवी. नम्रपणा हा देखील गुरू-शिष्याजवळ हवाच. अन्यथा अहंपणा, अभिमान, परस्परांतील संबंध बिघडवून टाकतील. परोपकार, सहनशीलता, सत्यता, न्यायप्रियता, उच्च विचार अभिलाषा हवी. हे गुणआदर्श गुरू-शिष्य दोघांच्याही ठिकाणी हवेत.
गुरूपेक्षा विद्यार्थी श्रेष्ठ झाला पहिजे अन् अशावेळी गुरूला अभिमान वाटला पाहिजे व विद्यार्थ्याला याबाबत गर्व वाटता कामा नये. त्याने आपल्या यशाचे श्रेय गुरूला दिले पाहिजे. गुरूच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शिष्याने ज्ञान वसा घेतला पाहिजे व इतरांना दिला पाहिजे. अशा आदर्श गुरू-शिष्यांच्या जोड्या झाल्या तर देशाचा लौकिक खऱ्या अर्थाने वाढेल असे मला वाटते.
धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये
जरूर कळवा.
टिप्पण्या