या भरचौकात वर्षानुवर्षे उभं राहून राहून माझे पाय शिणलेत. नको नको ते या कलियुगातले नेते, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, पायदळी तुडवले जाणारे सत्य, शिव आणि सौंदर्य, माणुसकीवरच झालेला अत्याचार, गोरगरिबांच्या किंकाळ्या त्यांचे विलाप हे सगळं पाहून नेत्र शिणलेत. कान शिणलेत.
असंख्य चांदण्या आकाशात चमचमताहेत पण या नीरव शांततेत माझ्या मनातल्या विचारांचा हल्लकल्लोळ कुणाला ऐकू तरी जाईल का? कोण ऐकणार माझे दुःख? कोण पुसणार माझे अश्रु?
खरचं काय चाललंय तरी काय? स्वच्छ खादीचे कपडे घालून स्वावलंबी जीवन जगणारा गोरगरिबांची आत्मियतेने सेवा करणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी आयुष्य वेचलं. स्वातंत्र्याच्या आंदोलनात एक सच्चा शिपाई म्हणून मी लढलो. कधी कशाचीही अपेक्षा कुणाकडूनही केली नाही. आज मात्र मृत्युनंतर या पुतळ्याच्या रूपानं माझे हे चिंडवडे का निघताहेत तेच कळत नाही.
इथे ना कुणी कधी साफसफाई करत ना कुणी मान वर करून इथला ताम्रपट वाचत. माझं सदेव उन्नत असलेलं हे मस्तक आता जणू कावळ्यांसाठी आ झालयं. जे मस्तक कधी भल्या भल्यांसमोर झुकलं नाही, अन्यायाशी झगडताना वाकलं नाही, ज्याला कधी कुणी अपमानित करू शकत नाही, तो मी जिवतपणी कधीही न सोसलेल्या या नरक यातना आता भोगतो आहे.
खरंच सांगतो...... तुम्हा साऱ्यांना मला एकच सांगायचं आहे. ऐकाल का माझं म्हणणं? ही अशी आमची दगडी स्मारक करून लक्षावधी रुपये मातीमोल करण्यापेक्षा आम्ही ज्या नीतीमूल्यांसाठी आयुष्य वेचलं त्यासाठी एखाद्याने उभे रहा. खऱ्या अर्थानं कार्यतत्पर व्यक्तिंना त्यांच्या कार्यासाठी मदत म्हणून आवश्यक त्या वस्तू इमारती व इतर सोयी द्या. गरिबांसाठी पाण्याच्या दिवाबत्तीच्या सोयी करा. मानवतेच्या रक्षणासाठी तत्पर रहा हिच आमची खरी स्मारके .
आमच्या स्वर्गस्थ आत्म्यांना खऱ्या अर्थानं आनंद द्यायचा असेल तर फक्त मनातल्या मनात श्रद्धापूर्वक स्मरण आणि आम्ही सुरू केलेल्या कार्याचं नियोजन बद्धतेनं, सातत्यानं कृतिशील आचरणं एवढं केलतं तर आम्हा हुतात्म्यांना खराखुरा आनंद लाभेल खरं समाधान लाभेल. हा फुकटचा बडेजाव, मोठेपणासाठी चाललेली दिखाऊ धडपड हे सारं इथेच थांबलं पाहिजे. तोच खरा सन्मान असेल आणि तेच खरं आम्हा हुतात्म्यांचे स्मारक असेल.
धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.
टिप्पण्या