एकदा एका ऑफिसच्या बाहेर भली मोठी रांग दिसली. या रांगेत सर्व तरुण मंडळी होती. माझ्या मनात उत्सुकता जागृत झाली. ही सर्व मंडळे इथे कशासाठी जमली आहेत? कुतूहलाने मी तिथे उभा राहिलो. अन् त्यातल्या एका तरुणाला त्याबाबत विचारले. त्यावर तो जरा चिडलाच, काय राव थट्टा करता काय आमची? हसा, हसा आता हसताय, पण बाळांनो, शिक्षण झाल्यावर तुम्हालाही यायचंय आमच्या सारख्यांच्या रांगेत. खूप पायपीट करायची शिवाय टोणगा, घोडा, आयतं बसून खातो, लाज नाही वाटत, तुलाच कशी लागत नाही नोकरी? अशी मुक्ताफळे ऐकायची.
मी त्या तरुणाला विश्वासात घेतले, जेव्हा त्याला खात्री पटली मी त्याची चेष्टा करीत नाही तेव्हा तो मनातली व्यथा सांगायला तयार झाला.
काय सांगू दोस्ता तुला, माझं नाव विचारू नकोस. माझं नाव सध्या बेकार तरूण. माझा ठाव ठिकाणा जिथे जाहिरात तिथे अर्ज घेवून जाणे, मुलाखतीला रांगते बसणे, नंतर निराशा पदरी घेवून याच गोष्टीची पुनरावृत्ती काय सांगू तुला. आजकाल जगणं मुश्किल होऊन बसलयं. आईवडिलांना आम्ही मुलं ओझ वाटू लागलोय असं लाजिरवाणं जिणं. किती धडपडतोय पण यश काही हाती मिळायला तयार नाही. वाटलं होत मी शिकल्यावर वडीलाच्या खांद्यावरचं ओझ कमी होईल पण वाटलं नव्हतं पदव्या घेऊन पण आई-वडीलांच्या जीवावरच जगाये लागेल. नोकरीची वाट बघता बघता घर पण व्याजानेच गेले. शिकत असतानाच वाटलं नव्हतं सुखाचं स्वप्न बघता बघता जीवन बरबाद होईल.
आत्ताचंच उदाहरण घे ना. अरे साधी शिपायाची जागा भरायची आहे. जागा एक, अर्ज पाचशे, मुलाखतीसाठी चारशे, कसा काय लागायचा नंबर? मुलाखतीला गेल्यावर विचारतात अनुभव किती?
अस्सा राग येतो. नोकरी नाही म्हणून अनुभव नाही, अनुभव नाही म्हणून नोकरी नाही, अशा या दृष्टचक्रात अडकलोय. पदवीधर असूनही शिपायाच्या जागेसाठी अर्ज केला. म्हणून आमची चेष्टा केली जाते नि पुन्हा आपले आम्ही बेकार ते बेकारच, आपल्या या शिक्षणपद्धतींचाच आता मला राग यायला लागलाय. नुसतं पुस्तकी शिक्षण. त्या शिक्षणामुळे जर आम्ही आमचा चरितार्थ चालवू शकत नाही तर त्या शिक्षणाचा काय उपयोग? व्यावसायिक शिक्षण घेऊन देखील नोकरीची शाश्वती नाही. स्वतःचा व्यवसाय सुरू करावा तर भांडवल नाही. कर्जासाठी कारण आहे, पण तारण नाही.
रोजगार हमी योजना, सुशिक्षित बेकार योजना अशा नुसत्याच योजना सुरू होतात किंवा नुसत्या घोषणाच असतात. त्यातून काही फायदा नाही. भ्रष्टाचार, लाचलुचपत, वशिलेबाजी या साऱ्या समस्या आज आम्हां तरुणांना भेडसावत आहेत. आमचं खच्चीकरण होतय. आम्हांला उमलायच्या आतच कोमेजावं लागतंय.
योग्य माणसाला योग्य काम मिळाल्यासच कामाचा दर्जा वाढतो. हा साधा विचार कृतीत उतरत नाही ही वस्तुस्थिती आहे. कधी लागायची आमची जीवननौका पैलतीरी जीवन प्रवाहात मध्येच गटांगळ्या खाण्याची वेळ येणार आहे की काय समजत नाही. मन सुन्न होतं. वाटतं, कशाला शिकलो आपण? एवढं शिकून काय हमाली करायची की भीक मागायची? सरकारने आमच्या रोजगाराची हमी घेतली पाहिजे, अनेक उद्योगधंदे सुरू केले पाहिजेत. शिक्षण पद्धतीत बदल घडवले पाहिजेत. लहानपणापासूनच आवडीचे शिक्षण नि त्यानंतर आवडीचे काम मिळाले पाहिजे तरच सुंदर भारत, समर्थ भारत हे स्वप्न साकार होईल.
त्या तरुणाची व्यथा माझीच व्यथा बनली होती. मन सुन्न झाले होते नि विचारांचा गुंता सुटत नव्हता. मनाने मी केव्हाच त्या बेकारांच्या रांगेत जावून बसलो होतो.
धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये
जरूर कळवा.
टिप्पण्या