आजचा विद्यार्थी म्हटलं की, तो कालच्यापेक्षा वेगळा असणारच ! कारण कालच्या अनुभवाच्या परिस्थितीचा प्रभाव आजवर पडतो आणि म्हणूनच कालच्यापेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या हा नेहमीच प्रगल्भ आणि प्रगतीशील असतो यात शंका नाही. ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यालाच लागू पडते मग ती एक व्यक्ती असो किंवा पिढी !
आजचा विद्यार्थी ही एक नवी पिढी आहे. विद्यार्थी हे सर्वगुणसंपन्न असावेत. त्यांनी काही तरी चांगले करून नावलौकीक मिळवावा असे सर्वानाच वाटत असते. विद्यार्थीदशा ही मानवाच्या जीवनात एकदाच येते. या अवस्थेमध्ये तुमच्या जीवनाचा मार्ग निश्चित केला जातो. जीवनाला नवी दिशा, नवे वळण मिळते. या विद्यार्थीदशेमध्ये काही तरी चांगले मिळविण्याचा, कर्तृत्व सिद्ध करण्याचा, आपली वेगळी वाट चोखाळण्याचा उत्साह भरलेला असतो. पण उगीच वेळ वाया घालवू नका. हे वय आहे प्रगतीचे पुढे जाण्याचे आणि आकाशात भरारी घेण्याचे, नाही हे वय मुलांनी कट्टयावर बसण्याचे आणि प्रवेशद्वारी उभे राहण्याचे.
कालच्या पिढीला आजचा विद्यार्थी हा कधी-कधी बेशिस्त, उद्धट वाटतो पण खरंच तसे आहे का? तर नाही आजचा विद्यार्थी आपले हक्कच मागतो. त्यासाठी आंदोलन करतो शिवाय आजूबाजूला विस्तारत चाललेले क्षेत्र आणि त्या सर्व क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी चाललेली चढाओढ त्यामुळे येणारा ताण या आजच्या विद्यार्थ्याच्या मोठ्या समस्या आहेत. मोठ-मोठ्या शहरातून नोकरदार पालकांच्या मुलांना एकटेपणाला तोंड द्यावे लागते. त्यातूनच त्याच्यामध्ये न्यूनगंडाची भावना वाढीस लागते. आणि तो मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो. क्षुल्लक कारणावरून हतबल होतो आणि त्यातूनच व्यसनाधिनता आणि वाढत्या आत्महत्या यासारख्या अनेक समस्या नव्या पिढीने दिल्या आहेत आणि त्यांच्यात प्रसारमाध्यमाची भर पडली आहे.
आणि यासारख्या विद्यार्थ्याच्या समस्यामुळे लोक म्हणतात, 'आजचा विद्यार्थी खराब आहे पण या लोकांना असे बोलण्यास संधी का देता ? करा ना ! भरपूर अभ्यास, सर्व क्षेत्रांमध्ये भाग घ्या आणि जर आजच्या तरुणांनी राजकारणात भाग घेतला, तर कशाला उमेदवारी मिळेल ८०-८५ वर्षाच्या काठी टेकणाऱ्या म्हाताऱ्या (वयस्कर) लोकांना ? बनणार नाही प्रत्येकजण डॉ. ए. पी. जी. कलाम पण कळेल तरी राजकारण, बनणार नाही प्रत्येकजण 'सचिन' पण बनतील तरी चांगले खेळाडू बनणार नाही प्रत्येक मुलगी 'इंदिरा गांधी' किंवा 'किरण बेदी' पण बनेल तरी सुसंस्कृत भारतीय नारी, ज्या ठिकाणी असेल आवड तुमची त्याच क्षेत्राची करा निवड. शाळां, कॉलेजमध्ये विद्यार्थी फिरत असतात, नुसतेच इकडून तिकडे चुकतो तुमचा रस्ता का चुकविता ते मुद्दाम? कशासाठी शाळा आणि कशासाठी विद्यार्थीपण? स्वतःचे व्यक्तिमत्त्व हजारात एक घडावा. व्यक्तिमत्व म्हणजे फक्त सूट-बूट आणि गॉगल नव्हे हवी कशाला आपल्याला ही पाश्चात्य संस्कृती ? कारण आपली भारतीय संस्कृती जगात मानतात आणि तुम्ही का लागलात पाश्चात्यांच्या मागे? त्याची हुशारी घ्या. पण त्यांची संस्कृती नको. आपल्याकडे हुशारी आहे. पण ती आहे बंद कुपीत.
लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो जीवनामध्ये एक धागा सुखाचा आणि शंभर धागे हे दु:खाचेच असतात. त्याचा हसतमुखाने स्वीकार करा आणि अशीच पुढे पुढे वाटचाल करा आणि हे सर्व करण्यासाठी तुमच्यात धमक हवी. अडथळ्यांवर मात केलीत तर नशीब, देव हे सर्व आपल्या पायांचे गुलाम होतील. सोडून द्या नैराश्य, आदर करा आई-वडिलांचा आणि शिक्षकांचा आणि आयुष्यात पुढे.....आणखी पुढे चालत रहा !
धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये
जरूर कळवा.
टिप्पण्या